महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोलेंची टिका

Twitter : @maharashtracity

मुंबई: अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा आकड्यांचा खेळ असून प्रत्यक्षात काहीही नाही. शेतमालाच्या हमी भावाबद्दल अर्थसंकल्पात काहीच नाही, अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीबद्दल काहीच घोषणा केलेली नाही. जुन्या पेन्शनबद्दलही अर्थसंकल्पात कोणतेही सुतोवाच केलेले नाही. हा अर्थसंकल्प अर्थहिन व जनतेची दिशाभूल करणारा असून अर्थसंकल्पात केवळ घोषणांचा पाऊस असून अमृतकाळ सारखे गोंडस नाव देऊन प्रत्यक्षात शेतकरी, कष्टकरी, सामान्य जनतेला या अमृताचा अनुभव आलेला नाही व येणारही नाही. कारण ६.८ टक्के विकासदराने १ ट्रिलीयन डॉलरची अर्थव्यवस्था हे शिदे फडणवीस सरकारचे दिवास्वप्नच ठरणार असल्याची बोचरी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी अर्थसंकल्पावर केली.

दरम्यान, पटोले म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प फसवा आहे, या अर्थसंकल्पातून समाजातील कोणत्याच घटकाला काहीच ठोस असे मिळालेले नाही. अर्थसंकल्पाची सुरुवात संत तुकाराम महाराज यांना वंदन करुन केली. मात्र तुकाराम महाराजांचा अपमान करणाऱ्या बाबावर कारवाई केली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार उल्लेख केला, पण आमच्या दैवतांचा अपमान करणाऱ्या तत्कालीन राज्यपाल कोश्यारींवर भाजपा मूग गिळून गप्प बसले. छत्रपतींच्या स्मारकाचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले, पण ते स्मारक कधी पूर्ण होणार याबाबत बोलले नाहीत. मुंबई परिसराच्या विकासासाठी काही घोषणा त्या केवळ आगामी महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केल्या असल्याचेही पटोले म्हणाले.

मविआ सरकारने धानाला प्रति क्विंटल ७०० रुपये बोनस दिला होता. तो बंद करुन या सरकारने हेक्टरी १५ हजार रुपये जाहीर केल्याने शेतकऱ्यांचे क्विंटलमागे ३५० रुपयांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्याना नवीन वीज कनेक्शन देण्याची घोषणा केली. मात्र शेतकऱ्यांचे वीज बील माफ करण्याबाबत घोषणा केलेली नाही. फडणवीस यांच्या घोषणांवर विश्वास ठेवता येणार नाही. मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी ६.५ हजार कोटी रुपये कल्याण डोंबिवललीला देण्याची घोषणा केली होती, पण त्यातील एक दमडीही दिली नाही. एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाबद्दल अर्थमंत्र्यांनी चकार शब्दही काढला नाही. जुनी पेन्शन योजना लागू करावी ही मागणी जोर धरत असताना त्याबद्दल या अर्थसंकल्पात काहीच भाष्य करण्यात आलेले नाही. एकूणच हा अर्थसंकल्प केवळ घोषणांचा सुकाळ व अंमलबजावणीच्या नावाने दुष्काळ ठरणारा आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here