मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून अर्थसंकल्पाचे कौतुक

Twitter: @maharashtracity

मुंबई: अर्थतज्ञ, विकासाची दूरदृष्टी असलेल्या वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला हा अर्थसंकल्प राज्याला निश्चितपणे एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेकडे नेण्यासाठी मार्ग सुकर करेल. समाजातील सगळ्या घटकांवर विकासाच्या रंगांची उधळण करणारा हा अर्थसंकल्प घामाला दाम, कष्टाला मान, विकासाचे चौफेर भान देणारा असून त्याचवेळी शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी पुसणारा आणि विशेष म्हणजे गेल्या दहा वर्षातील सर्वोत्कृष्ट अर्थसंकल्प असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले.

दरम्यान, गेल्या दोन अडीच वर्षातले राज्याच्या प्रगतीवर आलेले मळभ दूर करणारा अर्थसंकल्प असून राज्याचे नाव देशात एका उंचीवर नेऊन ठेवणारा हा अर्थसंकल्प असल्याचेही शिंदे म्हणाले. अर्थसंकल्पातील ’पंचामृत‘ राज्याच्या विकासाची चक्र गतिमान करणारे असून गोरगरीब, शेतकरी, महिला यांना न्याय देतांना उद्योग, पायाभूत सुविधांना वेग देणारा अर्थसंकल्प असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. अर्थसंकल्पात शेतीसाठी भरीव तरतूद केली असून नमो शेतकरी महासन्मान निधीचा दीड कोटी शेतकऱ्याना लाभ होणार असून महाकृषी विकास अभियान योजनेमुळे राज्यात क्रांती होणार आहे. केवळ एक रुपयात पिक विमा घेता येणार असल्याने मोठा दिलासा शेतकऱ्याला मिळणार आहे. मागेल त्याला शेततळेचा विस्तार वाढविणे असो किंवा विदर्भ, मराठवाड्यातील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्याना अन्नधान्याऐवजी रोख रक्कम देणे असो, ५००० गावांत जलयुक्त शिवार, सिंचनाचे विविध प्रकल्प पूर्ण करणे यासाठी या अर्थसंकल्पात केलेली तरतूद निश्चितच भरीव असल्याचे शिंदे म्हणाले.

महिलांचे सक्षमीकरण होणार :

चौथ्या सर्वसमावेशक महिला धोरणाची अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय नोकरदार महिलांसाठी केंद्राच्या मदतीने ५० वसतिगृहे, निराधार व निराश्रित महिलांसाठी नवीन ५० शक्ती सदन, एसटी बस प्रवासात सरसकट ५० टक्के सूट, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ, महिला खरेदीदाराला स्टॅम्प ड्युटीमध्ये एक टक्का सवलत दिल्याने तसेच लेक लाडकी योजना पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलींना लागू केल्याने महिला सक्षमीकरण होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

दुर्लक्षित घटकांना न्याय :

अर्थसंकल्पात दुर्लक्षित घटकांना सुद्धा न्याय देण्यात आला असून धनगर समाजाला १ हजार कोटी, ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेचा लाभ देणे, ज्येष्ठांसाठी प्रत्येक पालिका क्षेत्रात विरंगुळा केंद्र, महात्मा जोतिराव फुले जनारोग्य योजनेत उपचाराची मर्यादा ५ लाखापर्यंत वाढविणे, निराधारांना अर्थसहाय वाढविणे, यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रकल्पबाधित मासेमारांना नुकसानभरपाईसाठी धोरण राबविण्याचा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. विविध असंघटित कामगार, विविध दुर्लक्षित समाजांसाठी महामंडळे स्थापल्यामुळे ते मुख्य प्रवाहात येतील. आदिवासी आश्रमशाळांना आदर्श बनविण्याचा निर्णय, ही महत्वाचा आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उवाच :

१) यावर्षी १० लाख घरांचा महत्वाकांक्षी कार्यक्रम तसेच मागासवर्गीयांसाठी ३ वर्षात १० लाख घरांची ’मोदी आवास घरकुल योजना‘
२) राज्यात महामार्गांचा विस्तार, नवीन रस्ते मेट्रो प्रकल्प, बसस्थानकांचे आधुनिकीकरण, विमानतळांचा विकास, यामुळे राज्यात बदल दिसणार
३) उद्योगांना कुशल मनुष्यबळासाठी १० उत्कृष्टता केंद्रे, आयटीआयचे आधुनिकीकरण, ७५ हजार शासकीय पद भरती, स्टार्टअपसाठी नवी मुंबईत कळंबोली येथे निवासी प्रशिक्षण संशोधन संस्था
४) राज्यात ६ प्रमुख शहरांत सर्क्युलर इकॉनॉमी पार्क
५) मुंबईच्या सुशोभिकरणासाठी १७२९ कोटींचा खर्च.
६) डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक, तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक यासह इतरही स्मारकांना वाढीव निधी
७) श्री क्षेत्र रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करणे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या स्मृत्यर्थ आष्टी, वर्धा येथे स्मारक, धार्मिक क्षेत्रांचा विकास यामुळे महाराष्ट्राचे वैभव वाढेल. राज्याच्या पर्यटन आराखड्यामुळे पर्यटनाला देखील चालना.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here