Twitter : @maharashtracity
मुंबई
राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने १९ जुलै ते १८ ऑगस्टपर्यंत डोळे आलेल्या रुग्णांची दैनंदिन आकडेवारी अहवालातून समोर आणली. यात प्रचंड प्रमाणात चढ-उतारच दिसून येत आहे. दरम्यान १९ जुलैपासून रुग्ण आढळू लागले. तेव्हापासून धीम्या गतीने या आकडेवारीत वाढ होताना दिसून येत आहे. तर ७ ऑगस्ट ते ९ ऑगस्ट या तीन दिवसात मोठी वाढ झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. ९ ऑगस्ट रोजी राज्यात तब्बल ४३ हजार १३७ वर रुग्णांची संख्या गेली होती.
जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरावड्यात डोळ्याचे रुग्ण आढळू लागले. यात डोळे चुरचुरण्यापासून ते लाल होण्यापर्यंत तक्रारी घेऊन रुग्ण रुग्णालयात येऊ लागले. सोबत ताप असल्याने आय फ्लूच्या दिशेने तपासण्या होऊ लागल्या. सार्वजनिक आरोग्य विभागाने देखील हातपाय धुवा, डोळे चोळू नका, घरगुती उपाय न करता तक्रारी असल्यास रुग्णालयात डॉक्टरांना भेटा असे आवाहन करत जागरुकता निर्माण करण्यास सुरुवात केली. मात्र हे रुग्ण वाढतच होते.
सुरुवातील पाचशे – सहाशेत आढळणाऱ्या या संसर्गाच्या रुग्णांनी २८ जुलै रोजी दहा हजार संख्या पार करत १२ हजार ७७ अशी नोंद करण्यात आली. त्यामुळे हे प्रकरण गंभीर असल्याचे ध्यानात घेऊन आरोग्य यंत्रणा कामाला लागली. शहरांमध्ये संबंधित रुग्णांच्या नोंदी होऊन या संसर्गाची निरीक्षणे नोंदविण्यास सुरुवात झाली. तर ९ सप्टेंबर रोजी राज्यातील संसर्ग रुग्णांची संख्या ४३ हजार १३७ वर गेली. मात्र तेव्हापासून ही संख्या खाली उतरत असून २५ हजार, ३३ हजार, ९ हजार अशा संख्यांमध्ये नोंद झाल्याने आरोग्य विभागानेही सुस्कारा सोडला आहे. मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देणे सुरु असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.